महाराष्ट्र हे लोक चळवळीचे राज्य आहे.गेल्या शंभर- दीडशे वर्षाचा इतिहास पाहिला तर ते लक्षात येते.प्रत्येकाना ठावूक असलेल्या चळवळी पैकी एक म्हणजे लोकमान्य टिळकांची ‘स्वदेशी ‘कपड्याचा आग्रह आणि विदेशी कपड्यांची होळी तर महात्मा गांधीजीच्या प्रेरणेतून ब्रिटीश सत्तेविरुद्ध उभारलेली १९४२ ची ‘चले-जाव’ ची चळवळ.या चळवळी देशभर पोहोचल्या.

मराठवाड्यात विजयअण्णा बोराडे यांनी पाणी आणि माती यांचा अन्योन्न संबध स्पष्ट करताना ‘मुलस्थानी जल संधारण ‘हे काम एक गाव निवडून अथकपणे काम करून यशस्वी करून दाखविले.आडगाव,कडवंची आदी. ‘मानवलोक’ (अंबाजोगाई,जि.बीड) या स्वयंसेवी संस्थेने डॉ.द्वारकादास लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली बीडसह जवळच्या चार जिल्ह्यात जल साक्षरता आणि सर्वव्यापी जलसंधारण ही संकल्पना यशस्वी केली.कायम दुष्काळी व कोरडवाहू क्षेत्रात हे काम टिकले आहे आणि लोक या कामाशी पूर्णतः जोडले आहेत.कै.मधुकर धस यांनी ‘पाणी पंचायत’चे संस्थापक कै.विलास साळुंके यांच्यापासून प्रेरणा घेवून यवतमाळ आणि जवळपासच्या भागात जोमदार कार्य उभा केले.याशिवाय महाराष्ट्रात अनेक जल प्रेमी कार्यकर्त्यांनी आपल्या परीने सतत पाण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे तरीही हा प्रश्न पूर्णतः सुटला नाही.त्याची वेगळी कारणे आहेत,पण दिवसेंदिवस महाराष्ट्रातील पाणी प्रश्न जटील होत गेला,जवळपास ३३ हजार गावे पाणी टंचाईशी जोडली गेली.शेतीशी जोडले गेलेले असंख्य प्रश्न,नापिकी,कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी आत्महत्या होत राहिल्या हे खूप दुर्दैवी आहे.
आता जो जोर दिसतो आहे तो लोकसह्भागीय पाणी विषयक चळवळीचा.गेल्या चार पाच वर्षे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला आणि पाण्यासाठी सामजिक दायित्व पत्करून ज्यांनी आपल्या अनुभवाचा आणि सामाजिक भावनेला संवेदनशीलतेची जोड देऊन परिणाम साधला त्यात आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंहजी हे प्रमुख नाव. त्यांनी ‘जल-जन जोडो’ चं माध्यमातून देशव्यापी चळवळ राबविली आहे.महाराष्ट्रात त्यांनी गेल्या अठरा वर्षात प्रामुख्याने जल-जागरण आणि प्रबोधन करून गेली पाच-सात वर्षे ‘नदी आणि ओढा पुनरुज्जीवन’ कार्याला चळवळीच्या रूपाने जोर दिला.भूगर्भातील पाण्याचे संवर्धन,दक्षतापूर्ण उपयोग या हा मुद्दा लावून धरत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.’संत-समाज-शासन आणि संशोधक’यांचा समन्वय आणि ‘नदी-नीर-नारी सन्मान’ या संकल्पनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले.

‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१६ च्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.लोकांनी ही संकल्पना स्वीकारली.सन २०१७’ च्या स्पर्धेत एकुण २,०२४ गावं सहभागी झाली प्रत्येक गावातुन ५ याप्रमाणे १०,१२० प्रशिक्षणार्थी प्रत्यक्षपणे सहभागी झाले. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत जवळ जवळ १९ केंद्रांवर प्रशिक्षण घेण्यात आले आणि ८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत प्रत्यक्ष कार्य असा कार्यक्रम ठरला गेला.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ३० तालुक्यातुन एकूण २,०२४ गावांचे प्रवेश अर्ज जमा झाले श्रमदानातून लोकांना जोडण्याचे तंत्र हे या चळवळीचे वैशिष्ट्य पानी फाउंडेशनचे समन्वयक डॉ.अविनाश पोळ यांनी 'गावाचे जल आरोग्य' बाबतची माहिती दिली. आमीर खान व त्यांच्या पत्नी किरण राव, डॉ.पोळ (सातारा) यांनी राळेरास(ता.बार्शी,जि सोलापूर) व भागाईवाडी (ता.उ.सोलापूर ) येथे भेट देऊन तेथील कार्यकर्त्यांसमवेत श्रमदान करून त्यांचा उत्साह वाढविला.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका कायम दुष्काळी.या तालुक्यातील ४६ गावे ‘पानी फाउंडेशन’शी जोडली आहेत.राजु वाघमारे(जवळा,ता.सांगोला) हे पूर्णवेळ कार्यकर्ते या चळवळीशी जोडलेले.गेले पाच-सहा महिने ते याच कामच्या पूर्वतयारीसाठी मेहनत घेत होते.त्यांची पत्नी गीतांजली ही शिक्षिका.दोन लहान मुले आणि शेती करणारे आई वडील असा त्यांचा परिवार.ते स्वतः श्री श्री रविशंकरजी यांच्या ‘आर्ट ऑफ लिविंग’शी जोडलेले.उत्तम साधक म्हणून त्यांचा या तालुक्यात परिचय आणि चांगली ओळख आहे. गेल्या पाच सहा महिन्यातील त्यांचा अनुभव खूप प्रेरणादायी आहे.

‘नाम फाउंडेशन’ ने आत्महत्या ग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन करताना विधवा महिलांना १५ हजार रुपये अर्थसहाय्य करून महाराष्ट्रातील आणि जगभरातील महाराष्ट्रीय बांधवाना मदतीसाठी आवाहन केले त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

Path Alias
/articles/calavalaicae-raajaya-mahaaraasatara-anai-dauradaaivaanae-ataa-saetakarai-atamahatayaacae
Post By: Hindi