नदीला गत वैभव आपणच प्राप्त करून देवू शकतो - भाग 10


इंद्रायणी नदी वर भुशी धरणावरील परिस्थिती सुध्दा खूप चांगली आहे काही प्रमाणात वडगांव पर्यंत आज सुध्दा वर्षभर नदी शुध्द सापडते थोडक्यात काय ? शासनात काम करणाऱ्या प्रत्येकाने नदीकडे पाहतांना अथवा नदी विषयक धोरणे आखतांना नदीवर प्रत्यक्षात न जाता फक्त कार्यालयात बसून नदी बाबत अनास्थाच व्यक्त केली आहे.नद्यांच्या गत वैभवाबाबत मी लिखाण सुरू केले हे जरी खरे असले तरी आमची पध्दत अशी विचित्र आहे की आम्ही कोणास अक्कल शिकवायची नाही फक्त आपल्या स्वत:च्या अकलेने जे जमेल तेवढे जनहिताचे व मानवाच्या कल्याणासोबत निसर्गाच्या संवर्धनाचे काम निशुल्क करावयाचे, पण मग प्रश्न येतो तो मोबदल्याचा. जेव्हा आपण बोलतो माझ्या मोबदल्याचे काय तर तो मोबदला आर्थिक नसावा. पैश्याच्या ठिकाणी 'आत्म समाधान' तत्सम सकल्पनेत बसणारा हवा असावा व तो आम्हास प्राप्त होत आहे हेच खरे नदी प्रेमाचे गमक आहे.

आपण खूप मासिकातून कित्येक वेळेस अनेक विचार व मते चांगल्या व निस्वार्थी लेखकांच्या लेखणीतून वाचतो पण कधीकधी काही जण नवीन विचार व्यक्त करण्याऐवजी नव्या शंका व्यक्त करतात आणि त्यांच्या शंका बद्दल सुध्दा अनेक शंका इतरांना निर्माण होतात. त्या म्हणजे त्या शंका ह्या टिकात्मक आहेत की खरच त्यामागील काही वैचारिक बैठक आहे याचा शोध घेताना मन सुन्न होते व वाटते की नद्या प्रदूषित झाल्याने जलप्रदूषणाचा परिणाम मानवाच्या चांगल्या प्रगत मेंदूवर सुध्दा होवू लागला आहे व म्हणूनच आपण नदी प्रदूषण लकरात लवकर थांबविले पाहिजे.

आपला मागचा अंक जलसंवाद - नोव्हेंबर 2015 पान नंबर 22 वर मला अपरिचित असलेले मी प्रथमच ऐकलेले एक सरकारी निवृत्त अधिकारी यांनी नद्यांचे गत वैभव.... अपेक्षा आणि वास्तव हा निव्वळ सुंदर लेख नसून त्याला आपण 'काजळ' किंवा 'नेत्रांजन' म्हणू या. त्यात हाताळलेला विषय म्हणजे आपणास काम करण्यासाठी प्रत्यक्षात नदी पात्रात उतरण्याची दिलेली एक ऊर्जा व फक्त उगाच तोंडाची बडबड करणाऱ्या पर्यावरण वादी मंडळीला चपराक आहे.

त्यात माझ्या लेखातील नदी गत वैभव बाबतची चर्चा व त्या मागील अंकात मी नदी गत वैभव मांडलेली अपेक्षा पुण्यातील एका लेखकाने मन:पूर्वक वाचली आणि त्याच अंकात व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे अगदी योग्य आहे. नदी गत वैभव ह्याला काही काळाचा अथवा पर्वाचा संदर्भ असावा व त्याप्रमाणे आपण तो संदर्भ या पूर्वीच दिला आहे तो म्हणजे जी मंडळी साठीच्या वयाची अथवा ज्येष्ठ असतील त्यांनी त्यांच्या बालपणीची स्वत: अनुभवलेली नदी आठवावी व जे आज 40 वर्ष वयाचे तरूण असतील त्यांनी त्यांच्या आई वडिलांनी दाखविलेली नदी आठवावी असाच आहे, या अगोदर ह्याच विषयावर आपण लिहित आलो आहोत त्यामुळे आपल्याला फक्त आपल्या डोळ्यांनी स्वत: पाहिलेल्या गत वैभवाबाबतच बोलण्याचा अधिकार आहे. मी स्वत: 1975 साली पवना, इंद्रायणी व मुळा नदीतील पाणी प्यायलो आहे. मला पिण्यासाठी दुसरे पाणी नव्हते म्हणून मी ते पाणी प्यायलो असे नाही तर मी ह्या नद्यांमध्ये ऐन तरूण पणी यथेच्छ पोहलो आहे.

अंगावरील कपडे काढून ते प्रथम धुवायचे ते सुध्दा 501 बार साबण लावून व नंतर ते कपडे सुकून परत घालण्यास योग्य होईपर्यंत नग्न अवस्थेत नदीत डुंबत बसायचे व भूक लागली तर नदीच्या किनाऱ्यावरील उंबराच्या झाडावर पिकलेले लाललाल उंबर खायचे अथवा जर जांभूळ - आंबा यांचा मोसम असेल तर जांभळे अथवा पिकलेले आंबे पाडायचे व नदीतील पाणी प्यायचे आणि सोबत चिंचा घरच्या मंडळी साठी पाडायच्या अथवा झाडावर चढून काढायच्या मगच घरी परतायचे, कित्येक वेळेस मी नदीतील मासे सुध्दा पकडले आहेत. येवढेच काय खेकडे सुध्दा पकडून त्यांच्या नांग्यांना लव्हाळयाच्या पातीने बांधून यांच्या सोबत मजा केली आहे, हे मी अनुभवलेले गत वैभव आहे. आपण हा आनंद अनुभवला आहे का ?

आपण उगाच कशाला बाजीराव पेशवे, शिवाजी राजे यांच्या इतिहासातील मनमोहक वर्णनांचे दाखले देवून नदी गत वैभवासाठी अपेक्षा करावी, अर्थात आपले इतिहासातील पुरावे सगळेच खरे असतील याबाबत शंका तर सर्वांनाच आहे. मला आपणास सांगायचे आहे ते म्हणजे आज सुध्दा पवना नदीत मी ओंजळीने पाणी पिऊ शकतो व ही सत्य परिस्थिती रावेत धरणावर आत्ता आज 2015 साली सुध्दा आहे. पवना नदीला रावेत धरणापर्यंत आज सुध्दा गतवैभव टिकून आहे ज्याची आपण आज चर्चा करीत आहोत व काही जण त्या विषयावर फारच बेचैन झाले आहेत. आता प्रश्न उरतो तो असा की शहरीकरणामुळे गत वैभव म्हणजेच मागील 10 वर्षांपूर्वीचे नदीचे आरोग्य आज आपणास दिसत नाही कारण अफाट जनसंख्या व जलनिस्सारण विषयक प्रशासकीय निराशा व असंवेदनशीलता ज्याला आपण संवेदनहीन प्रशासकीय धोरणे व ती सर्व धोरणे राबविणारी मंडळी ही काम सुरू करण्यापूर्वीच हार मानणारी जन्माला आली आहे.

इंद्रायणी नदी वर भुशी धरणावरील परिस्थिती सुध्दा खूप चांगली आहे काही प्रमाणात वडगांव पर्यंत आज सुध्दा वर्षभर नदी शुध्द सापडते थोडक्यात काय ? शासनात काम करणाऱ्या प्रत्येकाने नदीकडे पाहतांना अथवा नदी विषयक धोरणे आखतांना नदीवर प्रत्यक्षात न जाता फक्त कार्यालयात बसून नदी बाबत अनास्थाच व्यक्त केली आहे. नदीवर प्रेम करणारे अधिकारी निर्माण झालेच नाही. नदी संवर्धन धोरणे बनवितांना जी मंडळी त्या शिष्टमंडळात होती ती अल्पकालावधी साठी त्या कामात सामावली होती पण पुढे त्यांच्या शिफारशी व सूचना अथवा अपेक्षित बदल करणारी माणसे फक्त महिन्याचा पगार विना मेहनत मिळविणारी होती व आहेत, म्हणजेच नोकरी करणारी शासकीय मंडळी ही माणसेच वेगळी होती व आज सुध्दा आहेत त्यामुळे प्रत्येक पर्यावरण प्रेमी शेवटी हाती निराशा घेवूनच ह्या विषयातून बाहेर पडला आहे.

श्री. चेतन पंडित यांनी त्यांच्या लेखात सारांश जो दिला आहे त्यांच्या आधाराने.....
1. नदी पर्यावरणात फार काही सुधार होण्याची शक्यता नाही....
याबाबत आम्ही म्हणजे आजचे नदी पर्यावरण प्रेमी मित्र अजिबात सहमत नाहीत या बाबतची खूप बोलकी उदाहरणे आपल्या समोर आहेत व मला खात्री आहे की हा व्यक्त होत असलेला निराशावाद अगदी काही थोड्या लोकांचा आहे व तो हळूहळू दूर होईलच. आपण पूर्णपणे आशावादी असण्यापेक्षा कृतीशील राहून चांगल्याची अपेक्षा करण्यासाठी साकारात्मक विचार सरणीच्या लोकांची संगत करणे आवश्यक आहे. नोकरीत सगळेच आपल्या मनासारखे होत नसते म्हणून जग वाईट आहे असे मत निवृत्त मंडळीने तरी न केलेले बरे कारण आज प्रत्येकास समाजात समाजहिताचा विचार करण्याची संधी दिली जात आहे. जर नदी पर्यावरणात फार काही सुधारणा होण्याची शक्यता नसेल तर कशाला आपण 'जलसंवाद' मासिकात कागद भरून लिहितो आहोत ? कशाला 'जलसंवाद' अंकात मान्यवर आपले विचार व्यक्त करीत आहेत. म्हणजेच आम्ही निराशावाद सांभाळत नाही, हा आजचा निराशावाद आपणास आशावादात परिवर्तित करायचा आहे व त्यासाठीच ही चर्चा आहे.

दुपारी भोजनानंतर जर आपण थोडी फार झोप घेत असाल तर यासंकाळी आपण चहा पिण्याचा कार्यक्रम नक्कीच करतो कारण नाहीतर आपणास तसेच लोळत पडण्याची प्रबळ इच्छा होत असते ती पुन्हा लोळत पडण्याची इच्छा मोडण्यासाठी चहा अपेक्षित असतो तोच प्रकार येथे आहे. आपणा सर्वांचा नदी विषयक खूप अभ्यास आहे त्या अभ्यासाचा वापर आपण जनजगृती साठी व चांगल्या बदलासाठी शासनावर दबाव टाकण्यास आपण सर्वांनी रोज एक तास चांगल्या विचारांच्या बैठकीत पोहचणे आवश्यक आहे मग ते शरीर रूपाने समाविष्ठ व्हायचे अथवा नाही व्हायचे हा आपणच आपला विचार करावा पण जर उत्तर हो असे असेल तर हाच समाज आपल्याला डोक्यावर घेईल व जर उत्तर नाही असे असेल तर आपण सभोवतालच्या प्रत्येक बाबतीत नकारात्मक विचारांनी स्वत:चे आयुष्य 15 वर्षांनी घटवित आहोत ह्या बाबत शंका नाही. स्वच्छ नदी, स्वच्छ पाणी, घनदाट वनराई व प्रसन्न वातावरण हेच गत वैभव अपेक्षित आहे. आम्हाला नदीत मासे हवे आहेत, नदीत पोहणारी माणसे व प्राणी दिसणे गरजेचे आहे, त्या पाण्यावर शेती व्हायला हवी. आमचा अजिबात आग्रह नाही की त्या नदीत आधुनिक बदल नसावेत. हा हट्ट आमचा नाहीच. आम्हाला बदलत्या राहाणीमानाप्रमाणे नदीचे रूप बदलले तरी चालेल पण नदीचा जीवंतपणा अबाधित रहाणे मात्र अपेक्षित आहे. तोच जीवंतपणा राखण्यासाठी नदीच्या गत वैभवाची अपेक्षा करणे म्हणजे अनाठायी अपेक्षा ठरणार नाही.

2. थोडा काही सुधार शक्य आहे. पण तो आधुनिक तंत्रज्ञानानेच होईल व त्या करता बराच खर्च करावा लागलेहा कसला सारांश आहे हे मात्र समजणे जवळ जवळ अशक्यच झाले आहे. थोडा सुधार होवू शकतो तर मग संपूर्ण सुधार का होवू शकणार नाही ? त्यामागील अशी कोणती आकडेवारी आहे की जी आपणास शक्य नाही. नदी स्वच्छ ठेवणे व नदीला तिच्या नैसर्गिक रूपातच ठेवण्याची जबाबदारी आपली सर्व नागरिकांची आहे त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक आहे हे जरा न पटणारे विधान वाटते व ही सरकारी पळवाट वाटते आहे. ज्या प्रमाणे हिमालयात राहणाऱ्यांना पुण्यात आल्यावर पंख्याच्या हवेची गरज भासते तोच प्रकार आज प्रत्येक हुषार (चांगल्या अर्थाने) निवृत्त सरकारी अधिकाऱ्याची होत आहे. त्यांना सर्वांना वाटते की जनसमुदायाच्या जनजागरणाने काहीही होणार नाही सर्व काही सरकारी तिजोरी मधील मोठ्या रकमा खर्ची केल्या तरच नदीचा सुधार होईल. पण वास्तविकता बदलता येणार नाही यासाठी योग्य व साजेसे उदाहरण आपणास पंढरपूरच्या वारीच्या काळात देहू, आळंदी व पंढरपूर शहरांची होत असलेली दुर्दशा.

सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतांना कित्येक करोडो रूपये दरवर्षी खर्ची घालत आहे व हे आजचे नाही तर मागील कित्येक दशकापासून हे चालले आहे तरी सुध्दा त्यात बदल होत नाही, कारण त्यात सामील होणाऱ्या वारकऱ्यांना कधीच कोणी समक्ष भेटले नाही व जर अगदीच भेटले असाल तर मंत्रालयात वारकऱ्यांची विकतची वकीली करणाऱ्या भोंदू वारकऱ्यांना, कारण त्यांना मोठी अनुदाने वारीच्या नावाखाली हवी असतात. वारकरी हा जर केंद्र बिंदू मानला व त्याला प्रबोधन करण्याची प्रक्रिया वर्षाचे 365 दिवस राबवली तर आमच्या नद्या व तिर्थक्षेत्र निर्मळ व स्वच्छ राहतील. पण आम्ही सरकारी अधिकारी कार्यालयातून बाहेर येवून साकारात्मक दृष्टीने काम करण्यास तयार नाही कारण त्यांना त्यासाठी कोणताही पगार नाही मग कशाला फुटकच्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या असा प्रश्न उभा राहतो ? आपणास नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी विचारांचे मंथन अपेक्षित आहेच त्याच बरोबर नदी बाबत प्रेम व्यक्त करणाऱ्यांच्या विषयी आपुलकी व सहकार्याची भावना मनात प्रज्वलीत करून त्यांना कसे प्रोत्साहन देता येईल याकडे आपण आपला कल ठेवला पाहिजे. काही जण तर नदीतून होडीने जलदिंड्या काढतात पण नदी तीरावरच्या जनतेस कळत सुध्दा नाही की हे नक्की काय करित आहेत ? अशा वेळेस काय म्हणायचे ह्या लोकांना म्हणजेच त्या प्रयत्नांना ? मी तर म्हणेन की ही जलदिंडी काढणारी मंडळीच आजच्या मितीला समाजात चांगले जनप्रबोधन व कायम स्वरूपी सकारात्मक भावना निर्माण करण्यात यशस्वी होतील पण सध्याच्या त्यांच्या कार्य पध्दतीत सुध्दा काही भरीव सुधारणा अपेक्षित आहेतच.

एकंदरीत येथे अजिबात खर्चाचा विषयच येत नाही तर येथे संपूर्ण संबंध येतो तो आपल्या स्वत:च्या सकारात्मक मानसिकतेचा. पर्यावरणाबाबतची आकडेवारी व संदर्भ आज काल इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे त्यासाठी पुस्तकी पंडितांची गरज नाही अथवा त्यांचे स्थान आता गौण बनत चालले आहे. येथे पाहिजे फक्त कार्यक्षम व सकारात्मक दृष्टी आणि विचाराची माणसे. ती अनपढ अथवा अशिक्षित असली तरी विना आर्थिक मोबदला पर्यावरण विषयावर प्रेम करणारी असावीत व हीच आज गरज बनली आहे.

मला कल्पना आहे की पावसाच्या बदलत्या प्रकारामुळे पाण्याचा अभाव निर्माण होत आहे. काहींचे म्हणणे आहे की नदीतील पाणी पुरेसे नाही मग पाणी कोठून निर्माण करणार, पाण्याचा तुटवडा भासणार, नदीत पाणी कोठून येणार ? नदीत पाणी कोठून येणार असे जे म्हणतात त्यांनी जमिनीत मुरणारे पावसाचे पाणी व जंगलामुळे होणारी जमिनीच्या पोटातील पाण्याची साठवणूक या नैसर्गिक प्रक्रियेचा गांभीर्याने अभ्यास करावा व त्याचे फायदे तोटे काय होते अथवा आहेत याबाबत तरी निसर्गाची अमर्याद शक्ती बाबत अनास्था दाखवू नये.

प्रत्येकाने टेकड्या वाचवा बाबत बोलायला हरकत नाही पण त्याचबरोबर जंगले वाचविणे व जमिनीची आणि डोंगर माथ्यावरील मातीची होत असलेली धूप कशी थांबविता येईल या बाबत शासकीय नकारात्मक संदर्भ समोर न मांडता एकतरी असा उपाय समोर मांडावा की जो सहजरित्या विना शासकीय निधी अथवा विना शासकीय प्रस्तावाशिवाय राबविता येईल म्हणजेच फक्त स्थानिक पातळीवर जन सहभागातून व प्रत्यक्ष कृतीशील करण्याजोगा असावा. आपण विचार कराल की हे कसे शक्य आहे ? कित्येक जंगलात जंगली प्राणी व आदिवासी वस्त्यांना पिण्याचे पाणी वर्षभर मिळावे म्हणून सामाजिक संस्थांनी तळी खोदली आहेत व ती सर्व सरकारी अनुदाना व्यतिरिक्त व सरकारी प्रस्तावाविना हे शक्य झाले. जर हा प्रयोग करण्याचा प्रयत्न शासनाकडून झाला असता तर त्यासाठी नकारात्मक मानसिकतेच्या सरकारी मंडळी कडून अनेक नकार घंटा वाजल्या असत्या व त्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या असत्या व नंतर असे जाहीर झाले असते की 'जंगलात प्राणी किती आहेत याची सरकारी नोंद नाही व तेथे आदिवासी राहतात असा कोणताही पुरावा सरकार दप्तरी नाही म्हणून असा प्रकल्प राबविणे म्हणजे सरकारी निधीचा अपव्यय आहे, जंगलात लाभार्थी नाहीत म्हणून असा प्रकल्प मान्य नाही'. असो. ह्या सरकारी भाषेची आज सर्वांना ओळख झाली आहे म्हणूनच सामाजिक संस्था स्वत:हून हे प्रकल्प राबवून त्या जैवविविधतेचे संवर्धन करीत आहेत.

जंगलातील तळी आणि नदी गत वैभव यांचा काय संबंध येथे येत आहे ? हा संबंध ज्यांना कळला त्यांनी हिवरे बाजार सारख्या गावात आज सुबत्ता निर्माण केली व गुजराथ मधील नदी नाल्यांना आलेला जीवंतपणा सुध्दा ह्याचेच एक उदाहरण आहे. खूप ठिकाणी नदीचे गतवैभव ह्या संकल्पनेचा आधार घेवून आपण विषय पुढे नेत आहोत. आज कित्येक पर्यावरण अभ्यासक व तज्ज्ञ मंडळी आपली पर्यावरण विषयक तळमळ व कमविलेला अनुभव त्यांच्या लिखाणातून व्यक्त करीत आहेत. फक्त एकाच आशेपोटी ते म्हणजे पुढच्या पिढीला नदी काय होती व ती कशी वाचविता येईल याबाबत मार्गदर्शन. आज नदी दिसते आहे उद्या ती नदी कोणत्या रूपात असेल याचे वर्णन आज करणे तसे अवघड आहे.

नदी चे लचके तोडले आहेत याचा अर्थ एवढाच अपेक्षित आहे की नदी ह्या विषयाला समोर ठेवून नदीच्या नावावर केलेली आर्थिक लुटमार व ती सर्व केली आहे ती सरकारी यंत्रणेतील हुषार मंडळींने, आपण रोज वाचतो आहोत की जलसिंचन या विषयात काय घडले आहे ? नदी सुधार ह्या गोंडस नावाखाली आर्थिक लुटमार चालूच आहे. यामध्ये सरकारी यंत्रणाच जास्त पुढाकार घेवून गडबड करीत आहेत, गंगा स्वच्छता सारखा अयशस्वी प्रयोग हे याचे बोलके उदाहरण आहे. सरकारी मंडळीस जनसमुहाचा सहभाग अजिबात नको, स्वत:च्या कर्मचारी वर्गाकडून किंवा सरकारी यंत्रणेकडून काही करावयास नको, सर्व काही ठेकेदार मार्फत करून घेण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे अनेक फायदे लाटण्याचा मोकळा मार्ग आपोआप पदरी पडतो आहे. नदी प्रदूषण विषयाचे फक्त अहवाल बनविणे व एकमेकांवर आरोप करणे व नदीचे प्रदूषण कधीच नियंत्रणात येणार नाही आदी विचार वारंवार समाजासमोर मांडून जनसामान्यांना नकारात्मक मानसिकतेकडे वाहत नेण्याचे षडयंत्र अतिशय शिताफीने शासकीय मंडळी करीत आहे.

शासन काय करीत आहे या पेक्षा आम्ही आज काय करणार व कसे करणार याबाबत लगेच कामाला लागणे अतिशय महत्वाचे आहे. यंदा पाऊस कमी पडला व त्यामुळे धरणात पाणी कमी झाले म्हणून प्रशासनाने नागरिकांना दिवसा आड अथवा दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्याचे आदेश काढले आहेत पण नागरिक खरेच कमी पाण्यात भागवतात का ? हे पहाणे गरजेचे आहे. उद्या पाणी येणार नाही म्हणून आज पाण्याचा साठा करावयाचा व पुन्हा दोन दिवसाने पाणी आले की साठविलेले पाणी धडाधड ओतून द्यायचे हे चित्र सर्वत्र बघण्यास मिळत आहे. या विषयाचा संबंध नदी गत वैभवाशी आहे कारण पूर्वी प्रत्येक जण आपल्याला आवश्यक पाणी मग ते गावाची गरजेचे असो नाहीतर पुण्यासारख्या प्राचीन परंपरेचे शहर असो, प्रत्येक जण स्वत: एकत्रितपणे पाणी साठवण करीत असत व त्या पाण्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक गावाची सर्वमान्य नियमावली असायची, पिण्याचे पाणी घरात घागरीतून साठवून ठेवायचे व शिल्लक पाणी पाळीव प्राण्यांना पिण्यासाठी वापरायचे अशी एक पध्दत असायची.

आज शिळे पाणी ओतून देण्याची ही पध्दत बंद व्हावी म्हणून आम्ही नदी प्रेमी मंडळी पिंपरी चिंचवड शहरातील वरिष्ठ महाविद्यालयात जावून मुलींशी व मुलांशी संवाद साधून त्यांना फक्त आजच्या पाणी टंचाईची भयानकता समोर मांडतो आहोत व पाण्याचा अपव्यय टाळण्याचे सल्ले देत आहोत व ही योजना यशस्वी झाली. चिंचवड गावातील जैन विद्यालयात हा प्रयोग अतिशय यशस्वीपणे करण्यात आला. मागील 12 वर्ष या विषयावर आम्ही सर्व जण महापालिका शाळातून हा प्रयोग करीत होतो. जरी त्या वेळेस पाण्याची कमतरता होती अथवा नव्हती, आमचा प्रयत्न पाण्याचा सदुपयोग व्हावा ह्या बाबत जनजागरण व कृतीशील सहज शक्य सवयी बाबत 'बाल पर्यावरण संस्कार.'

आजच्या लेखनातून मी कोणासही दोष देण्याचा विचार मांडला नाही तर सरकारी यंत्रणेतील नकारात्मक विचारसरणी, सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्या सेवा निवृत्ती नंतर सुध्दा समाजात पसरवत असतात याबाबत दृष्य रूपावार थोडे विचार मांडले आहेत.

पण काही झाले तरी आपण आपल्या नद्या गतवैभव कडे नेवू शकतो हा विचार मात्र पक्का आहे. काल नदी जशी होती तशीच आज ठेवायची त्यात यश आले तर दोन दिवसापूर्वी कशी होती तशी ठेवण्याचा प्रयत्न करू व हळूहळू एकदा जर का ते गमक उमगले व अंगी ती कार्यपध्दती जडली तर मात्र आपले स्वप्न अगदी खरे ठरेल. चला आशावादी बनू या. ज्यांना सोबत यायचे असेल त्यांनी सोबत यावे, ज्यांना घरी बसायचे असेल त्यांनी आम्ही केलेल्या कामाच्या बातम्या वाचाव्यात व आम्हाला चांगले सल्ले द्यावेत. ते सल्ले आम्हाला कितपत उपयोगी ठरतील ते आम्ही तुमच्या प्रामाणिक हेतू प्रमाणे ठरवून त्यांचे पालन करूच.

धन्यवाद.
मालिका - श्री. विकास पाटील, पुणे - मो : 07798811512


Path Alias

/articles/nadailaa-gata-vaaibhava-apanaca-paraapata-karauuna-daevauu-sakatao-bhaaga-10

Post By: Hindi
×